Thursday, September 29, 2011

नको नको रे पावसा ...!!



नको नको रे पावसा
असा अवेळी धिंगाणा
घर माझे चंद्रमौळी
आणि दारात सायली;

नको नाचूं तडातडा
असा कौलारावरुन,
तांबे सतेलीपातेलीं
आणू भांडी मी कोठून?

नको करु झोंबाझोंबी
माझी नाजूक वेलण,
नको टाकू फुलमाळ
अशी मातीत लोटून;

आडदांडा नको येउं
झेपावत दारांतून,
माझे नेसूचे जुनेर
नको टांकू भिजवून;

किती सोसले मी तुझे
माझे एवढे ऐक ना,
वाटेवरी माझा सखा
त्याला माघारी आण ना;

वेशीपुढे आठ कोस
जा रे आडवा धावत,
विजेबा, कडाडून
मागे फिरव पंथस्थ;

आणि पावसा राजसा
नीट आण सांभाळून,
घाल कितीही धिंगाणा
मग मुळी न बोलेन;

पितळेची लोटीवाटी
तुझ्यासाठी मी मांडीन,
माझ्या सख्याच्या डोळ्यांत
तुझ्या विजेला पूजीन;

नको नको रे पावसा
असा अवेळी धिंगाणा
घर माझे चंद्रमौळी
आणि दारात सायली....

- इंदिरा संत 

मृग



माउलीच्या दुग्धापरी
आले मृगाचे तुषार,
भुकेजल्या तान्ह्यासम
तोंड पसरी शिवार

तुकोबाच्या अभंगाला
मंद चिपळ्याची साथ,
भरारतो रानवारा
तसा झाडाझुडूपांत

पिऊनिया रानवारा
खोंड धांवे वारेमाप,
येतां मातीचा सुगंध
स्तब्ध झाले आपोआप

अवखळ बाळापरी
पक्षी खेळती मातींत,
उभारल्या पंखावरी
थेंब टपोरे झेलीत

धारा वर्षतां वरुन
बैल वशिंड हालवी,
अवेळीच फुटे पान्हा
गाय वत्साला बोलवी

-ग. दि. माडगुळकर

सागरा प्राण तळमळला !



ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला ! ||धृo||

भूमातेच्या चरणतला तूंज धूंता, मी नित्य पाहिला होता ;

मज वदलासी अन्य देशिं चल जाउं; सृष्टिची विविधता पाहू .

तैं जननी हृद् विरहशंकितहि झालें, परि तुवां वचन तिज दिधलें,

'मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टिं वाहीन. त्वरि तया परत आणीन !'

विश्वसलों या तव वचनीं, मी, जगदनुभवयोगें बनुनी,मी,

तव अधिक शक्त ऊद्धरली मी, "येईन त्वरें" कथुनि सोडिलें तिजला,

सागरा, प्राण तळमळला ! || १ ||

शुक पंजरिं वा हरीण शिरावा पाशीं, ही फसगत झाली तैशी !

भूविरह कसा सतत साहुं यापुढतीं, दश दिशा तमोमय होती,

गुणसुमनें मी वेंचियली या भावें, कीं, तिनें सुगंधा घ्यावें !

जरि उद्धरणीं व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा.

ती आम्रवृक्ष-वत्सलता, रे, नव कुसुमयुता त्या सुलता, रे,

तो बालगुलाबहि आतां, रे, फुलबाग मला, हाय! पारखा झाला!

सागरा, प्राण तळमळला ! || २ ||

नभिं नक्षत्रें बहुत, एक परि प्यारा- मज भरतभूमिचा तारा.

प्रासाद ईथें भव्य; परी मज भारी- आईची झोपडी प्यारी.

तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा- वनवास तिच्या जरी वनिंचा.

भुलविणें व्यर्थ हें आता, रे, बहु जिवलग गमते चित्ता, रे,

तुज सरित्पते, जी सरिता रे, तद्विरहाची शपथ घालतो तुजला

सागरा, प्राण तळमळला || ३ ||

या फेनमिषें हंससि,निर्दया,कैसा,कां वचन भंगिसी ऐसा ?

त्वस्वामित्वा सांप्रति जी मिरवीते, भिऊनि कां आंग्लभूमीतें,

मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी ? मज विवासनाते नेसी ?

जरि आग्लभूमि भयभीता, रे, अबला न माझि ही माता, रे,

कथिल हें अगस्तिस आतां,रे, जो आंचमनी एक क्षणी तुज प्याला,

सागरा, प्राण तळमळला || ४ ||


- स्वा. विनायक दामोदर सावरकर 

दगडाची पार्थिव भिंत



मी मुक्तामधले मुक्त - तू कैद्यांमधला कैदी।
माझे नि तुझे व्हायाचे - ते सूर कसे संवादी?

माझ्यावर लिहिती गीते - या मंद-समीरण लहरी।
माझ्यावर चित्रित होते - गरूडाची गर्द भरारी।।

जड लंगर तुझिया पायी - तू पीस कसा होणार?
माझ्याहून आहे योग्य - भूमीला प्रश्न विचार।।

आभाळ म्हणाले 'नाही' - भूमिही म्हणाली 'नाही'।
मग विनायकाने त्यांची - आळवणी केली नाही।।

पापण्यांत जळली लंका - लाह्यांपरि आसू झाले।
उच्चारून होण्याआधी - उच्चाटन शब्दां आले।

की जन्म घ्यायच्या वेळी - गंगेस हिमालय नाही।
शाई न स्पर्शली असूनी - हे अभंग नदिच्या 'बाही'।।

दगडाची पार्थिव भिंत - तो पुढे अकल्पित सरली।
'मी कागद झाले आहे - चल ‍‍‍‍‍‍लिही' असे ती वदली।

- मनमोहन नातू 

लेझिम चाले जोरात




दिवस सुगीचे सुरु जाहले, ओला चारा बैल माजले,
शेतकरी मन प्रसन्न जाहले..., छनझुन खळझण झिनखळ छिनझुन,
लेझिम चाले जोरात !

चौघांनी वर पाय ऊचलले, सिंहासनिं त्या ऊभे राहिले,
शाहिर दोघे ते डफ वाले..., ट्पढुम, ढुमढुम, डफ तो बोले..
लेझिम चाले जोरात !

दिवटी फुरफुर करू लागली, पटक्यांची वर टोंके डूलली,
रांग खेळण्या सज्ज जाहली, छनखळ झुणझिन, ढुमढुम पटढुम् ,
लेझिम चाले जोरात !

भरभर डफ तो बोले घुमुनीं, लेझिम चाले मंड्ल धरुनी,
बाजुस-मागें, पुढे वाकुनी..., झणछीन खळखळ, झिनखळ झिनखळ,
लेझिम चाले जोरात !

डफ तो बोले-लेझिम चाले, वेळेचे त्या भान न ऊरले,
नाद भराने धुंध नाचले..., छनझुन खळझण झिनखळ छिनझुन,
लेझिम गुंगे नादात् !

सिंहासन ते डुलु लागले, शाहिर वरती नाचू लागले,
गरगर फिरले लेझिमवाले..., छनछन खळखळ, झणझण छनछन,
लेझिम गुंगे नादात् !

दिनभर शेती श्रमूनी खपले, रात्री साठी लेझीम चाले,
गवई न लगे, सतारवाले..., छनखळ झुणझिन,रात्र संपली नादात्
लेझिम चाले जोरात् !

पहाट झाली - तारा थकल्या, डफवाला तो चंद्र ऊतरला,
परी न थकला लेझिम मेळां..., छनखळ झुणझिन, लेझिम खाली...
चला जाऊया शेतात् ! चला जाऊया शेतात् !!

- श्री श्रीधर बाळकृष्ण रानडे 

आम्ही कोण?



आम्ही कोण म्हणूनि काय पुससी? आम्ही असू लाडके-
देवाचे दिधले असे जग तये आम्हांस खेळावया;
विश्वी या प्रतिभाबले विचरतो चोहीकडे लीलया,
दिक्कालांतुनि आरपार अमुची दृष्टी पहाया शके

सारेही बडिवार येथिल पहा! आम्हांपुढे ते फिके;
पाणिस्पर्शच आमुचा शकतसे वस्तूंप्रती द्यावया -
सौंदर्यातिशया, अशी वसतसे जादू करांमाजि या;
फोले पाखडिता तुम्ही, निवडितो ते सत्त्व आम्ही निके!

शून्यामाजि वसाहती वसविल्या कोणी सुरांच्या बरे?
पृथ्वीला सुरलोक साम्य झटती आणावया कोण ते?
ते आम्हीच, सुधा कृतींमधुनिया ज्यांच्या सदा पाझरे;
ते आम्हीच शरण्य, मंगल तुम्हां ज्यांपासुनी लाभते!

आम्हांला वगळा - गतप्रभ झणी होतील तारांगणे;
आम्हांला वगळा - विकेल कवडीमोलावरी हे जिणे!

- केशवसुत 

सहानभूती



उभे भवती प्रासाद गगनभेदी
पथी लोकान्ची होय दाट गर्दी

प्रभादिपान्ची फ़ुले अन्तराळी
दौलतीची नित चालते दिवाळी

कोपर्याशी गुणगुणत अन अभन्ग
उभा केव्हाचा एक तो अपन्ग

भोवतीचा अन्धार जो निमाला
ह्रदयी त्याच्या जणु जात आश्रयाला

जीभ झालेली ओरडूनी शोश
चार दिवसान्चा त्यात ही उपास

नयन थिजले थरथरती हात पाय
रुप दैन्याचे उभे मुर्त काय ?

कीव यावी पण तयाची कुणाला
जात उपहासुनी पसरल्या कराला

तोची येइ कुणी परतूनी मजुर
बघूनी दिना त्या उभारुनी उर

म्हणे राहीन दीन एक मी उपाशी
परि लाभु दे दोन घास त्यासी

खिसा ओतुनी त्या मुक्या ओन्जळीत
चालू लागे तो दिन बन्धू वाट

आणी धनिकान्ची वाहने पथात
जात होती ती आपुल्या मदात.

- कुसुमाग्रज